औरंगाबाद- कार्यक्षम आणि धडाडीने निर्णय घेणारे मंत्री म्हणून नितीन गडकरी परिचित आहेत. मोदी सरकार मधील सर्वात व्यस्त मंत्र्यांमध्ये त्यांची गणना होते. नित्य नवे प्रयोग देशभर राबविण्यात त्यांचा हातखंडा ! डांबरी रस्त्यांमधील नवनवे प्रयोग गडकरींनी देशात आणले. त्यानंतर व्हाइट टॉपिंगचे रस्ते गडकरींच्या संकल्पनेत बनवली गेली. देशभर रस्त्यांचे जाळे अत्यंत कमी खर्चात बनवले. त्यामुळेच की काय सार्वजनिक बांधकाम खाते हे जणू समीकरणच बनले आहे. हजारो किलोमीटरचा रस्त्यांचे जाळे पसरविले नंतर गडकरी आता जलमार्ग आणी रोप वे च्या प्रेमात पडले आहेत.
आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव जलसिंचन परिषदेत शहरासाठी रोप वे चे प्रेझेंटेशन देऊन गडकरींनी शहरवासीयांना सुखद धक्काच दिला. परिषदेतील आपल्या भाषणात गडकरींनी सिंचनावर इतर राज्य करीत असलेल्या प्रयत्नांचा ऊहापोह केला. आणि छोटी राज्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त बजेट खर्च करीत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या ध्यानात आणून दिली. आपल्याच सरकारमधील मंत्र्यांना खडे बोल सुनावण्याचे धारिष्ट्य गडकरी शिवाय कुणी दाखविणार नाही. स्पष्टवक्ते असलेल्या गडकरींनी मात्र प्रसंगी कठोर आणि तितकेच प्रेमाचे संबंध सर्वपक्षीयांशी राखले आहेत.
खरेतर जलसिंचन परिषदच्या निमित्ताने आलेल्या गडकरींनी याच विषयावर उहापोह करावा हे अपेक्षित होते. मात्र औरंगाबाद शहराची जुळलेली नाळ येथील समस्या बाबत परिचित असलेले गडकरी गप्प बसतील हे कसे! त्यांनी इतर राज्यांच्या मंत्र्यांसोबत स्थानिक पदाधिकार्यांना ही रोपवे चे प्रेझेंटेशन दाखविले. इतर देशात तयार केलेले रोप वे रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी कसे फायदेशीर ठरले याची माहिती दिली. रोपवे आर्थिक फायदेशीर कसा असू शकतो याचेही गणित गडकरींनी सांगितले. शहरासाठी मेट्रो मुळीच परवडणारी नाही एवढे ठामपणे सांगत आपल्याच पूर्वीच्या मताचे खंडन गडकरींनी यावेळी केलेले दिसले.
कारण यापूर्वीच सिमेंट रस्ते, स्काय बस असो की, मेट्रो सरकारमधील प्रत्येक मंत्र्यांनी या योजनांची भलावण केली होती. मात्र, मेट्रो प्रचंड महागडी आहे व शहराला परवडणारी नाही हेही गडकरींनी ठासून सांगितले. मेट्रोसाठी पाच ते सहा हजार कोटी आणणार कुठून असा सवाल करीत महानगरपालिकेला ङ्गरोप वेफ साठी किमान पन्नास लाखाचा खर्च प्रारंभी करा, असा सल्ला दिला. डॉफल मेअर या कंपनीशी करार करून महानगरपालिका, सिडको तसेच लोकप्रतिनिधी रक्कम उभारण्याबाबत विचार करू शकतात, असे गडकरी म्हणाले. जुन्या शहरातील गर्दी लक्षात घेता त्याचबरोबर जालना रोडसह इतर प्रमुख रस्त्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ङ्गरोप वेफ हा समर्थ पर्याय असल्याचे गडकरींनी ठासून सांगितले.
डॉफल मेअर कंपनीने प्राथमिक स्तरावर अभ्यास केला. शहागंज येथून विमानतळ, रेल्वे स्टेशन, एसटी बस स्टँड, टीव्ही सेंटर, हर्सूल टी पॉइंट अशा वर्दळीच्या ठिकाणी जाण्यासाठी रोप-वे बनविण्यासाठी आराखडा तयार केला आहे. ङ्गरोप वेफने रस्त्यावरील वाहतूक निम्म्यापेक्षा अधिक कमी होईल, असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला. रस्ते बनवण्यासाठी होणारा खर्च, वारंवार दुरुस्तीचा खर्च, यापेक्षा रोप-वेची वाहतूक अत्यंत सुलभ व कमी खर्चाची असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले. गडकरींच्या पुढाकाराने सुरू होत असलेल्या या नव्या प्रयोगाला कितपत यश मिळेल हे येणारा काळच सांगेल.